वाद वेदोक्ताचा - 2

सर्व क्षुद्रांचा गलबला!

तुमचे शिवाजी महाराज असतील शककर्ते, किंबहुना ते नसते तर आमची सुंता वगैरे झाली असती असे जे कवि भूषणने म्हटले ते आम्हालाही मान्यच आहे. त्यासाठी आम्ही त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणू. पण त्यांना आम्ही क्षत्रिय मात्र म्हणणार नाही, कारण कलीत क्षत्रिय नाहीत, अशी अवघी पुराणमतवादी मानसिकता होती. गागाभट्टाने त्यांना आधी शूद्र म्हटले ते यातूनच.

त्याचे असे झाले, की शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांच्या मुलाचा व्रतबंध करायचा होता. ते ऎकल्यावर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी त्यांची कुचेष्टाच केली. कारण बाळाजी आवजी हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. आणि ब्राह्मणांच्या लेखी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही जात तर वर्णसंकरातून तयार झालेली. तेव्हा त्यांना कसले आले वेदोक्त कर्माचे वगैरे अधिकार ! पण कायस्त प्रभूंना मात्र हे मत मान्य नव्हते. त्यांच्या मते ही क्षत्रिय जात असून, 'गोविंदभट्टी' या ग्रंथानुसार पंधराव्या शतकात त्यांचा वेदाधिकार मान्य झालेला आहे आणि स‌न 1663मध्ये कायस्थ प्रभूंचा मुंजीसारखे संस्कार करण्याचा अधिकार प्रस्थापित झालेला आहे. पण तरीही 1669 साली मोरोपंत पिंगळ्यांनी प्रभूंना हा हक्क नसल्याचे म्हटल्यावर बाळाजी काशीच्या पंडितांकडे धाव घेतली. पण हाय रे चिटणीसांचे दैव! काशीच्या विद्वान ब्राह्मणांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या म्हणण्यावरच शिक्कामोर्तब केले. त्यांनी बाळआजी आवजींनाच शूद्र ठरविले असे नाही, तर शिवाजी महाराजांनाही ते क्षत्रिय नस‌ल्याने छत्रसिंहासनाचा अधिकार नाही, असा निर्णय दिला. तशा आशयाचे गागाभट्ट या पंडिताचे पत्र घेऊन केशवभट्ट पंडित, भालचंद्रभट्ट पुरोहित आणि सोमनाथभट्ट कात्रे महाराष्ट्रात आले. हा निर्णय पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी निळो येसाजी प्रभू पारस‌नीस यांना काशीला पाठविले. त्यानंतर गागाभट्ट स्वतः रायगडावर आले आणि त्यांचे मत बदलल्याने त्यांनी शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला.

महाराष्ट्रातल्या स‌नातनी ब्रह्मवृंदाला मात्र गागाभट्टांची ही करणी कधीच पसंत पडली नाही. वाई येथून निघणा-या 'धर्म' या साप्ताहिकाचे संपादक काशिनाथ वामन ऊर्फ भाऊशास्त्री लेले यांनी तर असे जाहीर केले, की शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करणारे गागाभट्ट काशीकर हे शिवाजी महाराजांचे उपदेशगुरूही नव्हते व कुलगुरूही नव्हते, तर ते एक भाडोत्री विद्वान होते. "जातिविषयक प्रश्न उपस्थित झाल्यास शिवाजी महाराज शूद्र होते असे एक वेळच नव्हे परंतु अनंत वेळा जरी 'धर्म'संपादकाने प्रसिद्ध केले तरी त्यात त्याचा अपराध तो काय होणार आहे?" असा लेलेशास्त्रींचा स‌वाल होता.

तिकडे स‌याजीराव गायकवाड जेव्हा वेदोक्ताबाबत ब्राह्मण पंडितांचा स‌ल्ला घेत होते, तेव्हा राजारामशास्त्री टोपले हे महाराजांना इषारा देत होते, की "महाराज, आपण क्षत्रिय आहात वगैरे गोष्टी ख-या, परंतु या नव्या भानगडीत आपण पडणे इष्ट नाही, वेदोक्त हे विष आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून त्याजबद्दलचा हट्ट धरला त्यांचे कल्याण झाले नाही. त्यांच्या राज्यास अवनती प्राप्त झाली. स‌बब त्या विषाची परीक्षा आपण पाहू नये. " शिवछत्रपती शूद्र असताना त्यांनी वेदोक्त पद्धतीने आपणांस राज्याभिषेक करवून घेतला त्यामुळे त्यांना फार काळ राज्य लाभले नाही आणि त्यांच्या नंतर त्यांनी स्थापिलेल्या स्वराज्यावर गंडांतरे आली आणि राज्याचे तुकडे पडले. प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी तर याहीपुढे जाऊन लिहिले, की "शककर्ते शिवाजी महाराजांस ज्यांनी रायगडी राज्याभिषेक केला व 'क्षत्रियकुलावतंस' म्हटले त्यांचे (गागभट्टांचे) निधन शौचकूपात पतन पावून झाले अशी दंतकथा आहे. एकंदर काय बीज असेल ते असो. 'परमेश्वरो वै वेत्ति' मूळ अस्सल क्षत्रियकुळी असेल परंतु स‌हवास व शरीरसंबंधांचा परिणाम देवास आवडत नसेल."

शिवछत्रती क्षत्रिय असून, त्यांना छत्रसिंहासनाचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी बाळाजी आवजीने मोठी मुत्सद्देगिरीची कामगिरी केली. त्यांनी काय केले, तर भोसल्यांच्या वंशावळीचा धागा थेट उदेपूरच्या रजपूत राजघराण्याशी नेऊन भिडविला, असे प्रबोधनकार ठाकरे सांगतात. पण हे तरी स‌नातनी ब्राह्मणांना कुठे मान्य होते? त्या थोर ब्रह्मवृंदाचा धोशा एकच होता. कलीत क्षत्रिय नाहीत, असे स्मृती सांगत असल्याने रजपुतांना तरी क्षत्रिय कसे म्हणता येईल? लेलेशास्त्री लिहितात, "रजपूत हे क्षत्रिय नसून ते त्याहून निराळे आहेत. संस्कृतमध्ये त्यांना उग्र असे नाव आहे. त्यांची कर्मे गागाभट्टाच्या वंशातील गागभट्टापासून तिसरा पुरुष जो कमलाकरभट्ट त्याने शूद्र कमलाकरात सांगितली आहेत... शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी क्षत्रियापासून जो पुत्र उत्पन्न होतो त्याची जाती उग्र ही होय. शिवाजी हा रजपुतांचा वंशज होता असे जरी मानिले तरीही तो क्षत्रिय ठरणे मुळीच शक्य नाही. शिवाय शिवाजी हा जर क्षत्रिय असेल, तर विवाहापूर्वीच त्याचे उपनयनही व्हावयास पाहिजे होते, परंतु तसे मुळीच झालेले नाही. आजच्या मराठे जातीस एका विवाहावाचून दुसरा कोणताही संस्कार मुळीच माहीत नाही, हे निर्विवाद आहे.... 'विवाहमात्रं संस्कारं शूद्रोSपि लभते स‌दा' (शूद्रासही विवाह हा एकच संस्कार प्राप्त होतो) या स्मृतिवचनाप्रमाणे मराठे हे शूद्रच आहेत असे मानणे भागच आहे."

अर्थात जातीदंभ केवळ स‌नातनी भटभिक्षुकांमध्ये होता असे मानण्याचे काही कारण नाही. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी पंडितांची महासभा घेऊन स‌र्व मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करून घेतले. पण मग त्यांनाही ही जातिश्रेष्ठत्वाची बाधा झाली. स‌र्व मराठे क्षत्रिय आहेत हे या पंडितसभेत मान्य झाल्यानंतर ते स्वतःस सिसोदे राजे भोसले असे म्हणवून घेऊ लागले आणि ग्वाल्हेरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले आणि बडोद्याचे गायकवाड यांना कुणबी म्हणून कमी लेखू लागले. "अलीकडे कुणबी वगैरे पैकेकरी होऊन या ज्ञातीत फितुर करून बाटवितात. (सोयरिका करतात) हे जाहल्यास धर्म राहणार नाही... हिंदुस्थानात शिंदे वगैरे कुणबी लोक आहेत त्यास ताकीद जाली पाहिजे... गायकवाडाची सोयरिक करू तरी कासीत मात्रागमन केल्याचे पातक" अशी छत्रपती प्रतापसिंहांची स‌मजूत होती.

स‌याजीराव गायकवाड, शाहू महाराज यांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यानंतर असा हा स‌र्व क्षुद्र मतांचा गलबला सुरू होता.

बडोद्यास स‌याजीराव गायकवाडांना या शूद्रत्त्वाचा मोठा मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी वेदोक्ताचा आग्रह धरला. पण त्याला तेथील ब्रह्मवृंद त्यास तयार नव्हता. तेव्हा मग त्यांनी स‌रळ आपल्या सेवेतील ब्राह्मणांची हकालपट्टी करून, त्यांऎवजी गुजराती, मारवाडी ब्राह्मण नेमून वेदोक्तानुसार धर्मकर्मे सुरू केली. ते प्रकरण काही फारसे पेटले नाही. पण इकडे शाहू महाराजांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यावर मात्र जणू आभाळच कोसळले असे झाले. पुण्यात, कोल्हापुरात सनातन्यांचे जणू बंड माजले.

आधी म्हटल्याप्रमाणे हा वणवा पेटला, तो एका उद्धट, बाहेरख्याली ब्राह्मणाच्या उर्मट उद्गारांनी. काय होते ते उद्रार, की जे ऎकून शाहूंसारखा राजर्षि कोपायमान झाला आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला चाबकाने फोडून काढले?


संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पृ. 39 -52

2 comments:

Vaidehi Bhave said...

namaskar,

tumacha blog mala khup avadato. itihasavishayi kutuhul ani godi laayache kam tumhi karat ahat. asech lihit raha. Pudhil at chalila manapasun shubbhechha

Chakali
चकली

Anonymous said...

नमस्कार विसोबा...!
तुम्ही मि.पा.वरही असता ना? च्यायला श्टामीना जबरदस्त आहे तुमचा....! पण हे लष्कराच्या भाक-या भाजल्यासारखे वाटत नाही का?